संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमा प्रश्नासंदर्भातील खटल्याच्या सुनावणीला महिनाभरात सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी सीमा प्रश्नासंदर्भात पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्याचे सीमा समन्वयक मंत्री, उच्चाधिकार समिती, तज्ञ कमिटी त्याचप्रमाणे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मुंबई मुक्कामी बोलवावी.अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने इस्लामपूर सांगली मुक्कामी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजित दादा पवार यांना दिले.
भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून लवकरच बैठक बोलवू ,असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. निवेदन देतेवेळी माजी मंत्री व आमदार जयंत पाटील, आमदार रोहित पवार यांच्यासह मध्यवर्ती समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, गोपाळराव देसाई, गोपाळराव पाटील, आबासाहेब दळवी, राजाराम देसाई, एन. बी. खांडेकर उपस्थित होते.