#गेली १६ वर्षे ज्ञानवर्धिनीचे कार्य चालु आहे.!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गेल्या १६ वर्षांपासून खानापूर, रामनगर, हुक्केरी, निपाणी तालुक्यातील तसेच पुण्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या गुणात्मक विकासाबरोबरच सर्वांगीण व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी ज्ञानवर्धिनीच्या माध्यमातून अनेकानेक व नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले. या दरम्यान ज्ञानवर्धिनीशी जोडल्या गेलेल्या पुणेस्थित ज्ञानवर्धिनी परिवाराचा स्नेहमेळावा गुरूवार दि. ७ रोजी उस्फुर्तपणे पार पडला. तसेच आर्थिक योगदानातून प्रतिष्ठानला भक्कमपणे साथ देणाऱ्या आधारस्तंभांचा गौरवही करण्यात आला.
याप्रसंगी ग्रुप कॅप्टन सुहास पाठक, पंप इंजिनिअरिंग सर्विसेसचे एम् डी. अल्फी मंतेरो, विश्वास ग्रुपचे अध्यक्ष बाळासाहेब पोकळे, डॉ. महेश पाटील, खानापूर (बेळगाव) मित्र मंडळचे अध्यक्ष विजय पाटील, महा बेलगामाईटचे अध्यक्ष सचिन पाटील, वाणी ग्रुपचे एम् डी मारूती वाणी, बीपीएलचे अध्यक्ष दत्ता भेकणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. ,
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पीटर डिसोझा होते.
यावेळी गौरवानंतर आपले मनोगत व्यक्त करताना बऱ्याच आधारस्तंभांनी ज्ञानवर्धिनीच्या कार्याचे कौतुक केले व आपण या प्रतिष्ठानचा एक भाग असल्याने अभिमानास्पद बाब असल्याचेही सांगितले. तसेच प्रतिष्ठानच्या यापुढीलही उपक्रमांना समर्थपणे योगदान देण्याचे आश्वासन दिले. व्यासपीठावरील पाहुणे मंडळींनी आपले विचार मांडताना ग्रामीण विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून वैविध्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवित असल्याने प्रतिष्ठानचे कौतुक केले तर सर्वांना सोबत घेऊन ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटत असल्याची बाब ही उल्लेखनीय असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात बोलताना पीटर डिसोझा म्हणाले कि गेल्या १६ वर्षाच्या प्रवासात अनेक मुख्याध्यापक, शिक्षक, तज्ञ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षणप्रेमी, शैक्षणिक संस्था या सर्वांचांच ज्ञानवर्धिनीच्या कार्यात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सहकार्य व सहभाग लाभलेला आहे. भविष्यातही समविचारी मंडळींना ज्ञानवर्धिनीशी जोडून ग्रामीण विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकसीत करून नवनवीन संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला कार्याध्यक्ष बी. जे. बेळगावकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले, संचालक वाटुपकर यांनी प्रास्ताविक केले, सचिव व्ही. बी. होसूर यांनी आभारप्रदर्शन केले .तर उपाध्यक्ष शिवाजी जळगेकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहखजिनदार मनोहर होनगेकर, संचालक संजीव वाटुपकर, टी. पी. जांबोटकर, अशोक चौघुले आदींनी परिश्रम घेतले तर खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ पुणेचे सहसचिव परशराम निलजकर, सहखजिनदार नारायण गावडे, संचालक रामचंद्र निलजकर, बाळकृष्ण पाटील, देमाची मष्णुचे आदींनी मोलाचे सहकार्य केले.