#सीमाप्रश्नाच्या सुनावणीसाठी एक लाख सह्यांची मोहिम!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नाचा दावा (क्रमांक ४/२००४) दि. २९ मार्च २००४ रोजी राज्यघटनेच्या अनुच्छेद १३१ (ब) अन्वये सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. पण २२ वर्षे झाली तरी त्याची सुनावणी सलग होऊ शकली नाही. सदर सुनावणी लवकरात लवकर जलद गतीने करावी, अशी विनंती बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सरन्यायाधीशांना करण्यात येणार आहे. यासाठी त्यांना सीमा भागातील मराठी भाषिकांचे एक लाख सह्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक मंगळवार दिनांक 31 मार्च रोजी सकाळी 11 वाजता शिवस्मारक खानापूर येथे बोलावण्यात आली आहे तरी खानापूर तालुका समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.
