खानापूर प्रतिनिधी
आरोग्य भारती, खानापूर शाखा, रावसाहेब वागळे पीयू कॉलेज, एनसीसी व रेड क्रॉस यांच्या संयुक्त विद्यमाने “नशामुक्त भारत – एक सामूहिक जबाबदारी” या विषयावर विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य एज्युकेशन सोसायटीचे समन्वयक तसेच बहुराव काकतकर महाविद्यालय, बेळगावचे निवृत्त प्राचार्य डॉ. डी. एन. मिसाळे हे होते. प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद हलगेकर (बेळगाव) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम अत्यंत मार्मिक, हृदयस्पर्शी व वास्तववादी उदाहरणांद्वारे प्रभावीपणे मांडले. त्यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाने उपस्थित विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले आणि व्यसनमुक्त जीवनाचा दृढ संकल्प करण्याची प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कोडला यांनी कार्यक्रमाची प्रस्ताविका करून कार्यक्रमामागील उद्देश आणि नशामुक्त भारत अभियानाचे महत्त्व विशद केले. त्यानंतर आरोग्य भारती, खानापूर शाखेचे अध्यक्ष तसेच खानापूर डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. डी. नाडगौडा यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. वासुदेव इनामदार यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली, तर लक्ष्मण शेट्टी यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी व्यासपीठावर प्राचार्या शरयू कदम, डॉ. सुदर्शन सुळकर, डॉ. शंकर पाटील, डॉ. प्रणिता देसाई आणि . राजू नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास रावसाहेब वागळे पीयू कॉलेजचे सुमारे ३०० विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच आरोग्य भारती, बेळगावचे. संजय कुलकर्णी,. लक्ष्मण शेट्टी, गोपाळराव देशपांडे (योग शिक्षक) तसेच आरोग्य भारतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्त भारताच्या संकल्पनेबाबत प्रभावी जनजागृती झाली असून, व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी प्रत्येकाने सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचा संदेश देण्यात आला.
