संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
चापगाव (ता. खानापूर) येथील गणेश चतुर्थी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंचायत क्षेत्रातील सर्व गावांमध्ये तातडीने गटार स्वच्छता करावी, बंद असलेले पथदीप सुरू करावेत, जल जीवन मिशनची अर्धवट कामे पूर्ण करावीत, कचरा गाडीची नियमित व्यवस्था करावी तसेच व्हीबी ग्राम रोजगार योजनेअंतर्गत स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने ग्रामपंचायत विकास अधिकारी जी एम कामकर यांच्याकडे केली.
यावेळी ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष रमेश धबाले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने ग्रामपंचायत कार्यालयात भेट देऊन विविध नागरी प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी एसडीएमसी अध्यक्ष मष्णू चोपडे, पीकेपीएस अध्यक्ष उदय पाटील, निवृत्त शिक्षक विलास धबाले, नागराज धबाले, परशराम पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
शिष्टमंडळाने सांगितले की, गेल्या वर्षभरात एकदाही गटार स्वच्छता करण्यात आलेली नाही. त्यामुळे गटारे तुंबून दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव व अस्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. तसेच अनेक रस्त्यांवरील पथदीप बंद असल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी अंधारात प्रवास करावा लागत असून सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बैठकीत जल जीवन मिशनची रखडलेली कामे, कचरा संकलनाची नियमित व्यवस्था आणि व्हीबी ग्राम रोजगार योजनेअंतर्गत ग्रामस्थांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत सखोल चर्चा झाली.
यावर पी डी ओ जी एम कामकर यांनी सर्व मागण्यांचा तपशील ऐकून घेत प्राधान्यक्रमाने कामांचे नियोजन करण्यात येईल व दोन दिवसांच्या आत गटार स्वच्छता, पथदीप दुरुस्ती आणि संबंधित विकासकामांना सुरुवात केली जाईल, अशी सकारात्मक ग्वाही शिष्टमंडळाला दिली.
